उन्हाळ्याच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी योग्य ते उपाय करू शकतो. त्यातीलच एक उत्तम उपाय म्हणजे शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी. अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा आता सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू झाला, की उष्णतेचे विकार डोके वर काढतात. या दिवसात बाहेरचे वातावरण तप्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते; त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्याचबरोबर शरीराचे तापमान कमी होणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, अस्वस्थ वाटणे, त्वचा लाल होणे, डोळ्यांचे विकार वाढणे, मळमळ होणे असे प्रकार होतात. म्हणूनच उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
या दिवसांत घशाला सारखी कोरड पडते, साध्या पाण्यानेही तहान भागत नाही आणि मग आपोआपच आपला ओढा काहीतरी थंड खाण्याकडे किंवा पिण्याकडे जातो. आइस्क्रीम, कृत्रिम शीतपेयांचा वापर करून आपण आपली तहान भागवतो. काही वेळापुरते आपल्याला छान वाटते; पण याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. कृत्रिम शीतपेयांऐवजी नैसर्गिक थंडावा देणारी सरबते उसाचा रस, कैरीचे पन्हे, ताक, शहाळ्याचे पाणी यांचे आपण जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे. आजकाल उन्हाळ्यात शूटिंगच्या ठिकाणी कलाकारांसाठी ताक, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी यांची सोय केलेली असते. शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी, उत्साह, ऊर्जा वाढविण्यासाठी नारळाच्या पाण्यासारखे उत्तम नैसर्गिक पेय नाही. त्याचा अतिरेक न करता योग्य प्रमाणात ते प्यावे. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत, ते थोडक्यात पाहू. शहाळ्याचे पाणी चविष्ट तर असतेच; पण त्याचसोबत मुबलक प्रमाणात खनिजद्रव्य असल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी होते; त्यामुळे थकवा जाणवतो. हाच थकवा दूर करण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी शहाळ्याच्या पाण्याची मदत होते. विद्यार्थ्यांनी, कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी शहाळ्याचे पाणी आवर्जून घ्यावे. बाहेरच्या तप्त वातावरणामुळे या दिवसांत शरीरातील उष्णताही वाढते. त्यामुळे डोळे लाल होणे, तोंड येणे, जळजळ होणे, पित्त वाढणे, पिंपल्स येणे असे प्रकार वाढतात. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी थंड असल्याने ते शरीरास थंड करते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता बाहेर फेकली जाते आणि शरीराचे तापमान सामान्य राहते. शहाळ्याच्या पाण्याने उष्णता कमी होते, बरोबरीने त्वचा निरोगी ठेवण्यासाठीही त्याचा फायदा होतो. नारळाच्या पाण्यात त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्याने त्वचेवरील डाग, पिंपल्स कमी होतात. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर शहाळ्याच्या पाण्यातील अँटीमायक्रोबियल, अँटिफंगल, अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेचा संसर्गापासून बचाव करतात. उन्हाळ्यात त्वचेबरोबर केसही कोरडे पडतात. त्यामुळे या दिवसात केस तुटणे, गळणे यांसारख्या समस्या वाढतात. नारळाच्या पाण्यामध्ये पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे या समस्या कमी होतात. केसांचे गळणे थांबून वाढ चांगली होते.

0 Comments